गुढीपाढवा आणि स्त्रीशक्तीचा आदर

 


गुढीपाढवा म्हणजे नव वर्षाची सुरुवात. निसर्गातील नव चैतन्याची चाहूल. गुढीपाढवा म्हणजे नवनिर्मितीचा कौतुक सोहळा.  निसर्ग आपले जुने वस्त्र सोडून नवीन परिधान करतो. विविध रंगाची फुले बहरतात , जणू रंगांची उधळण. तिजेल म्हणजे तृतीयेला चैत्र गौर बसवली जाते. जणू स्त्रीच्या सृजनशक्तीची पूजाच. निसर्गतही सृजनतेची पूजा सुरू असते आणि घराघरात चैत्रगौर बसवून स्त्रीच्या सृजनशक्तीची पूजा सुरू असते. 

अश्या पद्धतीची पूजा ही आपल्याला प्राचीन काळापासून दिसून येते.  ही पूजा लज्जागौरीच्या रूपात होत होती.  अश्या पद्धतीची पूजा आपल्याला काही ठिकाणी अजूनही चालू आहे.  ओडिशा मध्ये राजा पर्व हा एक उत्सव  आषाढ महिन्यात साजरा केला जातो.  पृथ्वी म्हणजे धरणीमाता हि ह्या काळात रजस्वला असते. त्यामुळे ह्या काळात विश्रांती मिळावी म्हणून शेतीची कोणतीही कामे केली जात नाहीत. या दिवशी सर्व शेतीची अवजारे धुऊन त्यांची पूजा केली जाते. मुली विविध प्रकारच्या झोपाळ्यांवर खेळतात . एकंदरीत हा उत्सव दारातीच्या पुर्ननिर्मितीच्या शक्तीचा उत्सव आहे.  अजूनही मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशात हिची पूजा केली जाते. 

ईशान्य भारतातील गुवाहाटी जवळील कामाख्या देवी हे अजून एक उदाहरण आहे.  योनीच्या रूपात ह्या देवीची पूजा होते. ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेली हि देवी. साधारणपणे जुने महिन्यात एक वार्षिक उत्सव होतो. ह्या काळात तिचा मासिक धर्म चालू असतो. त्या काळात मंदिर हे बंद ठेवले जाते.  हा काळ पवित्र मानला जातो. 

तर दक्षिण भारतात मुलीला जेव्हा पहिल्यांदा मासिक धर्म चालू होतो तेव्हा ऋतू काळ संस्कार हा विधी साजरा केला जातो. ह्या मागील विचार हा कि ती मुलगी आता शक्ती आहे. तिच्याकडे आता पुनर्निर्मितीची शक्ती आहे. आणि म्हणूनच तिचे ह्या दिवशी कोडकौतुक केले जाते. 

अर्थात हा माझा विचार आहे. आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह्य आहे.

टिप्पण्या